Wednesday, April 17, 2013

छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर 1680 च्या सुमारास संभाजीराजे गादीवर बसले.

तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत (1689) चा हा केवळ नऊ वर्षांचा काळ महत्त्वाचा आहे.”
“अवघे तेवीस वर्षांचे वय. औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी अशी गनिमांची संकटे चहूबाजूंनी
स्वराज्याला गिळंकृत करण्यास आली होती. मात्र त्याही स्थितीत संभाजीराजे संकटांवर केवळ
स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली. त्या नऊ वर्षांच्या काळात
त्यांनी केवळ स्वराज्याचे संरक्षण केले नाही तर संवर्धनही केले. स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला.
राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे तख्तही ते काबीज करू शकले असते.
ही कामगिरी “केवळ अद्‌भुत’ म्हणता येईल अशीच आहे. जगात त्याची तुलना होऊ शकत नाही.
उण्यापुऱ्या नऊ वर्षांत एकही पराभव, तह वा माघार नसलेल्या 240 लढाया त्यांनी केल्या.
सैन्यदल अफाट वाढवले. तंजावर (कर्नाटक), मद्रास (मदुराई), पावणकोट, त्रिचनापल्ली (तमिळनाडू),
पाटणा (बिहार), बंगालपर्यंत फौजा घुसवल्या. खजिना दुप्पट केला. शिवाजी महाराजांच्या राज्याचा
विस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला.
नऊ वर्षांत 240 लढाया करणारे युवराज संभाजीराजे दिवसाच्या 24 पैकी 20 तास घोड्यावर असत.
त्यांनी पत्नीला प्रशासकीय हक्क, अधिकार, स्वतंत्र शिक्का देऊन राज्य कारभार करायला प्रोत्साहन दिले.
स्वराज्याचा स्वतंत्र दारूगोळा कारखाना काढला. तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल बांधला.
नवी गावे बसवली. व्यापारी पेठा बसवल्या. धरणे बांधली. लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसनही केले.
आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली. चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसे दिली.
लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली. हे सारे करण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली.
वाटते तेवढे सोपे नाही. अद्‌भुत, अचाट, अतुलनीयच ठरेल.”
“संभाजीराजांनी शत्रूंवर एवढी जरब बसवली, की मुअज्जम आणि शहाबुद्दीन यांनी दोन बाजूंनी घेरण्याची
व्यूहरचना केली असताना गोवेकरांनी त्यांना मदत करण्याचे धाडसदेखील केले नाही. उलट संभाजीराजांचा
मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी राजधानीच बदलली.
मोगलाईला धोका होता म्हणून…
“”मराठ्यांचे स्वराज्य रयतेचं, तर सर्व शाह्या या बादशहांच्या होत्या. स्वराज्याचा प्रयोग भारतभर पसरण्याचा धोका होता
बुंदेलखंड त्याचे उदाहरण होते.
म्हणून औरंगजेब सर्व ताकदीनिशी स्वराज्य उद्‌ध्वस्त करण्यास दक्षिणेत आला.
पण स्वतःचं राज्य समजून मराठी जनता प्राणपणानं लढली. संभाजीराजांचं हौतात्म्य त्यांच्यासमोर आदर्श होता.
म्हणून औरंगजेबाचं स्वप्न अपुरं राहिलं. त्याला पुन्हा उत्तरेलाही जाता आलं नाही. त्याचा महाराष्ट्रातच अंत झाला.”

शिवरायांचा दरारा- संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत.

"शिवरायांचा दरारा"
संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला
मराठ्यांनी जेव्हा सुरतेवर हल्ला चढवला तेव्हा जे पत्र तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या वरिष्ठांना लिहिले ते अगदी तंतोतंत मी इथे देत आहे, यावरून आपल्या शिवछत्रपतींचा त्याकाळी मुघलावरती आणि इंग्रजामध्ये असलेला दबदबा लक्षात येईल.. ओळी कमीच आहेत पत्राच्या परंतु अर्थ भलताच मोठा आहे….
ते पत्र :-

Two days since we received Letters from
India, written by the English President residing
at Suratte, who acquaints us with
the daily fears they have there, from Sevagee
the Rebel, who having beaten the
Mogul in several Battels, remains almost Master of
that Countrey

हिंदुस्थानच्या इतिहासात अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक आहे….
शिवरायांची अभेद्य नजर कोणाही शत्रूवर पडल्यावाचून कधीही राहिली नाही, भविष्याचा अंदाज शिवरायांनी कधीच ओळखून ठेवला होता हे आपण सर्व जाणताच, शिवछत्रपतींचे मावळे, शिवछत्रपतींचे गनिमी युद्ध, शिवरायांचे अनुमान, शिवरायांचे ध्येय या सगळ्या गोष्टी किमान आपल्या समजण्याच्या पलीकडच्याच होत्या..
उपरोक्त पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते कि ज्यांनी हिंदुस्थानावर इतकी वर्षे राज्य केली त्यांच्यामध्ये शिवरायांचा किती दरारा होता..

दिनेश सूर्यवंशी , तुळजापूर.

।। गनिमीकावा ।।

"गनिमी कावा" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक युद्धतंत्र होते. " कमीत कमी फोजेने जास्तीत जास्त फोजेचा खातमा करणे आणि विजय संपादन करणे ". या तंत्राचा वापर करून महाराजांनी भल्या भल्या शत्रूला सळो कि पळो करून सोडले, धुळीस मिळवले आणि विजय संपादन केले. म्हणून महाराजांना " गनिमी कावा " या युद्धतंत्रचे जनक मानले जातात.
महाराजांचा एक भीषण गनिमी कावा…
शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही। पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला. तो चाकणवरचा. त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने आराम केला. आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हेरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत , याची त्याला कल्पनाही नसावी. त्याने जानेवारी १६६१ मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावर करण्याचा आराखडा आखला. या मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या सरदाराकडे सोपविले। हा खान घमेंडखोर होता. याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन ही हुशार , वऱ्हाडी सरदारीणही होती. खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाही. पण तो पंधरा हजारापेक्षा कमी नक्कीच नव्हता. शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण , पनवेल , नागोठणे हा भाग जिंकावयाचा हुकूम केला. पण हा कारतलब असा अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोरहोता की , त्याने म्हटले की , ‘ हुजूर , नागोठणे , पेण , पनवेल तर मी काबीज करतोच , पणकोकणातील शिवाजींचे कल्याण भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे) असलेली सारी ठाणी आणि मुलूख कब्जा करतो.
कारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्धतयारीचाही तपशील महाराजांना राजगडावर अचूक पोहोचला।
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला. आपण कुठे जाणार आहोत , आपला मार्ग कोणचा , शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे. इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही. ही गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या सरदारणीला आश्चर्याची वाटली. शिवाजी , सह्यादी , मावळे ,गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली जाण होती. पण तिने कारतलबशी एका शब्दानेही चर्चा वा विचारणा केली नाही. पण हा खान अंधारात उडी मारतोय , नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला. खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली। खानाचे सैन्य सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत अगदी अनभिज्ञ , म्हणजेच अडाणी होते. आंबेनळीच्या पायथ्याशी चावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती. गर्द जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती. ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५ किलोमीटर अंतराची होती. खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते. हा दिवस होता दि. २ फेब्रुवारी १६६१ . मोगली फौज त्या भयंकर वाटेने चालू लागली. त्यांना कल्पना नव्हती की , पुढे काय वाढून ठेवले आहे. पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन उभे होते। आणि या १५ किलोमीटरच्या गर्द झाडीत कमीतकमी पाच हजार मावळे जागोजागी खाचीकपारीत आणि झाडांच्या दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले होते. ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं , तशी चालली होती.शिवाजीराजांना या शत्रूचालीची खबर सतत समजत होती. त्यांच्या मनात कोवळी दया उपजली. ही सारी मोगली फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं. महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाईरायबाघनची. महाराजांनी आपला एक वकील वेगळ्या माहितीच्या वाटेनं कारतलबखानाकडे पाठविला. खान चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता. रायबाघनही तेथेच होती. मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने अदबीने खानाला महाराजांचा निरोप सांगितला , ‘ आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता. आपण अजूनही त्वरित माघारी निघून जावे , नाहीतर वेळ कठीण आहे. आमची विनंती ऐकावी.
‘ यावर खानाला जरा रागच आला। त्याने जबाब दिला की , ‘ मी काय निघून जायला आलोय काय ? कल्याण भिंवडीपासून सारं दख्खन कोकण काबीज करणार आहे मी. हे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर असलेली रायबाघन ऐकत होती. ती काहीही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश फाटले होते. खानाने वकिलाला असे फेटाळून लावले. वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला. त्याने त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला. दया करणारे महाराज संतापले. आणि त्यांना त्या समारेच्या गर्द ऊंबरखिंडीत ठायीठायी दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा पोहोचविला. अन् एकदम त्या हजारो मावळ्यांनी खालून चाललेल्या मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू केला. मोगलांची क्षणात तिरपिट सुरू झाली. कोण कुठून हल्ला करतोय , कुठून बाण येताहेत हेच समजेना , गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता. अक्षरश: ऊंबरखिंडीत तुडवातुडव , चेंदामेंदी , आरोळ्या , किंकाळ्या यांनी हलकल्लोळ उडाला, मोगलांना धड पुढेही जाता येईना अन् मागेही येता येईना.
याला मनतात गनिमी कावा ......... याचा वापर करून महाराजांनी भल्याभल्याना पाणी पाजले.